Chatrapati Shahu Maharaj Essay in Marathi: आजवर वेगवेगळे राजे आणि त्यांच्या राजवटी यांची माहिती आपण घेतलेली आहे. पण एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूरला लाभलेला हा राजा अगदी जगावेगळा होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत क्षण न् क्षण वेचला तो लोकांसाठी- आपल्या प्रजेसाठी. म्हणून तर त्यांचा उल्लेख करतात – ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज !’
छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध Chatrapati Shahu Maharaj Essay in Marathi
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी झाला. इ. स. १८९४ साली म्हणजे वयाच्या केवळ विसाव्या वर्षी त्यांनी संस्थानाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा, कार्याचा हेतू उद्देश एकच होता… आणि तो म्हणजे समाज परिवर्तन घडवणे. सामाजिक समतेसाठी, मानवी प्रतिष्ठेसाठी आणि गरिबांना विकासाची समान संधी मिळावी यासाठी शाहू महाराज यांनी हयातभर प्रयत्न केला.
Also Read: Motivational Story in Marathi
राजा असूनही त्यांनी वैभवाचा हव्यास धरला नाही. महाराजांचा बंगला असून महाराज सोनतळी कॅम्पमधील एका पत्र्याच्या शेडवजा घरात राहत. त्या घरात लाकडी बाजेवर एक प्रचंड मोठी गादी आणि घोंगडी हा या राजाचा बिछाना. समाजातील जो वर्ग नाडला-पिडला गेला होता त्यांना समाजव्यवहारात त्यांचा हिस्सा मिळावा म्हणून राजे शाहू महाराज झटले त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानांत अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. शिवाय गरीब लोकांच्या हितासाठी जे हुकूम, आदेश ते काढत, त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे ते स्वतः जातीने तपासत.
बहुजन समाजाची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी असेल, तर त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, हे राजांनी ओळखले होते. म्हणून राजांनी सोनतळी कॅम्पवर भटक्या- विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. हे भटके लोक स्थिर व्हावे म्हणून या राजाने आपल्या राज्यात विहिरी खणणे, घरकुले बांधणे अशी अनेक कामे सुरू केली. खाजगीतल्या पहाऱ्याचे काम पारध्यांवर सोपवले. प्रेमाने जग जिंकता येते, असा या राजाचा विश्वास होता.
शाहू महाराजांनी १९२० साली वेठबिगारीची पद्धत बंद केली आणि महार समाजाला गुलामगिरीतून पूर्ण मुक्त केले. या लोकराजाने महात्मा फुलेंचा सामाजिक समतेचा संघर्ष पुढे . नेला. आपल्या मनातले हे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच पुढे नेऊ शकतील, हे महाराजांनी ओळखले होते आणि तेच त्यांनी या आपल्या अशिक्षित प्रजाजनांच्या मनावर ठसवले. आपल्या लोककल्याणाच्या कार्यात सतत बुडालेल्या या राजाला १९२२ मध्ये अकालीच मृत्यू आला.